जामखेड शहरात भव्य शिवस्वराज्य रथयात्रा काढत केले जोरदार शक्तीप्रदर्शन
अहमदनगर -: अहमदनगर तालुक्यातील ४ शेतकऱ्यांनी या महिन्याच्या २० दिवसात आत्महत्या केल्या आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना त्याचे सोयरसुतक नाही. ते महाजनादेश यात्रा काढण्यात मग्न आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जामखेडच्या जाहीर सभेत केली.पाच वर्ष सत्तेत आहात. तुमचा मंत्री या जिल्हयाचं पालकत्व करतोय मग उजनीच्या बॅकवॉटरमधून पाणी आणायला का पाच वर्ष लागली असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
तुमचा माणूस निवडूनच आला नाही तर तुम्ही मंत्री कसं करणार आहे. तुम्हाला याला निवडून द्या असं सांगण्याची वेळ तुमच्यावर का आलीय असा सवालही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
भाजपच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा जो बोलेल ते करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
छत्रपतींचा आशिर्वाद घेवून ही शिवस्वराज्य यात्रा निघाली आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
बॅलेटपेपरवर मतदान घ्या अशी जनता म्हणत आहे परंतु एकमेव भाजप पक्ष घाबरत आहे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
येणारा काळ हा राष्ट्रवादीचा आहे. काही लोक गेले आहेत आणि चार दोन टकळी जाणार आहेत परंतु लक्षात ठेवा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीच्या झंझावातासमोर कमळाची पाकळीही शिल्लक राहणार नाही – कोल्हे
राज्यात राष्ट्रवादीचा झंझावात असा येणार आहे की, कमळाची पाकळीही शिल्लक राहणार नाही असा जबरदस्त इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जामखेडच्या जाहीर सभेत दिला.
उमदं नेतृत्व जामखेडमध्ये उदयाला येत आहे. एक महत्वाचं इथे घडलं आहे ते म्हणजे दोघेजण आमनेसामने येण्याची पहिली वेळ या जामखेडच्या रथयात्रेच्या माध्यमातून घडली आहे असेही अमोल कोल्हे म्हणाले.
खबरदार मशीनमध्ये घोटाळा केला तर हीच तरुणाई रस्त्यावर उतरुन पळता भुई थोडी करेल हे लक्षात ठेवा असा इशाराही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देतानाच असुदे मशीन घाबरुन जाऊ नका घ्या छत्रपतींचे नाव आणि करा परिवर्तन असा आत्मविश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेच्या मनात निर्माण केला.
तीन वर्ष कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जात आहे. ती तत्वत:, शाश्वत होती हे लक्षात घ्या असा टोला सरकारला लगावला.
जामखेड कर्जतमधील शेतकर्यांची शेती नुसतीच करपली नाही तर तरुणाचं भविष्य करपुन गेले आहे असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.
नुसते मेकअप करुन करुन मिरवणारे बॅनरमंत्री तुमचा विकास किती केला आहे हे चंद्रावर गेल्याचे समाधान रस्त्यावरील खड्ड्यातून जाताना मिळाले अशी जोरदार टिकाही नाव न घेता पालकमंत्र्यांवर केली.
२८८ आमदारांच्या मतदारसंघांपैकी विकासात एक नंबर कर्जत – जामखेड मतदारसंघ असेल- पवार
पुढच्या काळातील अडचणी एकत्रित येवून सोडवुया असे आवाहन करतानाच विकास इतका करुन दाखवू की २८८ आमदारांच्या मतदारसंघांपैकी विकासात एक नंबर कर्जत जामखेड मतदारसंघ असेल असे आश्वासन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दिले.
जो मी निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. हा मतदारसंघ फार वेगळा आहे. मराठ्यांची ऐतिहासिक लढाई येथे झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जन्मभूमी आहे. जगदंबमाईची ही भूमी आहे. शेतात कष्ट करणारे शेतकरी इथे आहेत हे माझं कुटुंब आहे असेही रोहित पवार म्हणाले.
इथले लोकप्रतिनिधी आता बॅनर मंत्री झाले आहेत. विकास गावात किती झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
अभ्यास करणार्या लोकांना सध्या संशोधन करण्याची गरज आहे. शहरात लावण्यात आलेल्या त्या बॅनरवर असलेला विकास गेला कुठे असा सवाल रोहित पवार यांनी केला त्यावेळी विकास वाड्यावर गेला असा जोरदार आवाज जनतेतून आला.
आज जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गटारे नाहीत. अशी परिस्थिती आहे. यांची विकास लावल्याची पद्धत आम्हाला मान्य नाही. शेवटच्या घटकांपर्यंत विकास जातो तो विकास असतो तोच विकास आपल्याला करायचा आहे असे आश्वासनही रोहित पवार यांनी दिले.
कर्जत – जामखेडची चर्चा राज्यात सुरु आहे. आज लाईट जी दिसते ती जनरेटरवर आहे. सर्वसामान्य लोकाच्या पोटावर पाय ठेवून तुमचा रथ जाणार असेल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
हक्काचं काम आपल्याला द्यायचं आहे. हाताला काम द्यायचं आहे. असंघटित कामगार आहेत त्यांना काम द्यायच आहे. युवक युवतींच्या भविष्यासाठी काम करायचं आहे असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी दिला. सर्वांचा विचार आपल्याला करायचा असून विकासाच्या पाठीशी उभं रहायचं आहे.त्यामुळे तुमचं प्रेम मला हवे आहे अशी मागणी जनतेकडे केली. युवक युवतींसाठी उद्योग देण्यासाठी एमआयडीसी आणणार होते ती एमआयडीसी कुठे गेली असा सवाल रोहित पवार यांनी केला.
तुमचं प्रेम बघता यापुढे राष्ट्रवादी हा पर्याय असणार आहे. ही लढाई सुरुच राहणार आहे असेही रोहित पवार म्हणाले. यावेळी भाजप, शिवसेना पक्षातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जामखेड शहरात भव्य मोटारसायकल आणि शिवस्वराज्य रथयात्रा काढत राष्ट्रवादीने जामखेड जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
शिवस्वराज्य यात्रेचा आजचा आठवा दिवस असून दुसरी सभा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील जामखेड येथे पार पडली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवा नेते रोहित पवार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे,जिल्हाध्यक्ष राजन कोठारी आदींसह कर्जत जामखेड मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.