कामठी :-शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी शासनाने प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना लागू केली असून या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3 हजार रुपये रक्कम ही निश्चित पेन्शन मिळणार आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे तेव्हा शेतकऱ्यांनी या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाययकाशी संपर्क साधून या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आव्हान कामठी तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांनी केले.
या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्ष वयोगटातील 2 हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्प भूधारक व सीमांत शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र असून या योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 च्या वयानुसार 55 ते 200 रुपये प्रति माह मासिक हफ्ता वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे तर यातील पात्र शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे.या योजनेची ग्रामपातळीवर सिएससी केंद्रावर नोंद सुरू असून 30 रुपये नोंदणी शुल्क देण्याची गरज नाही आहे यासाठी आधार कार्ड, बॅँक पासबुक, 8 अ खाते उतारा आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे .या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभातुन प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची अंशदायी हफ्ता रक्कम कपात करण्यात येईल.या योजनेअंतर्गत भारतोय जीवन विमा निगम (एल आय सी)द्वारा प्रबंधीत पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी वृद्धावस्थेतील निर्वाहासाठो अत्यन्त अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतेही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यानो दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली.
संदीप कांबळे कामठी