
मुंबई : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गृहनिर्माणासाठी मोठा निधी मंजूर केला आहे. पोलिसांच्या प्रलंबित घरकुल प्रस्तावांना हिरवा कंदील देत तब्बल १,७६८.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे अनेक दिवसांपासून विविध प्रस्ताव प्रलंबित होते. अखेर सरकारच्या मंजुरीनंतर या योजनांना गती मिळाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती देताना, पोलीस दलाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच २०१४ ते २०१९ दरम्यान सुरू असलेली व्याजसवलत अनुदान योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद झाल्याचा आरोप करत, विद्यमान सरकारने ती पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले.
‘घरबांधणी अग्रीम’ (HBA) योजनेअंतर्गत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घर खरेदी किंवा स्वतःच्या जागेवर बांधकामासाठी अर्ज केले होते. तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे पोलिसांना घरबांधणीसाठी आर्थिक आधार मिळणार असून, वाढत्या घरांच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले प्रस्ताव मार्गी लागल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढणार असल्याचे मानले जात आहे.








