
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या दु:खद निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पवार कुटुंबावर कोसळलेला हा आघात असह्य करणारा आहे. बारामतीसह राज्यभरात शोककळा पसरली असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
या धक्कादायक घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा मानसिक आघात बसला आहे. लाडक्या दादाच्या जाण्याची वार्ता समजताच त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर केवळ एकच शब्द झळकला — “Devastated (उद्धवस्त)”. एकाच शब्दात त्यांनी पवार कुटुंब, राष्ट्रवादी पक्ष आणि राज्याच्या राजकारणावर झालेल्या मोठ्या नुकसानीची तीव्रता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नियोजित सभेसाठी अजितदादा मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगपूर्वीच त्यांच्या छोट्या विमानाला भीषण अपघात झाला. विमान हेलकावे खात शेजारील शेतात कोसळले. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर एकामागून एक स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, दोन पायलट आणि इतर प्रवासी अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने लँडिंगसाठी एक फेरी मारली होती; मात्र दुसऱ्या फेरीदरम्यान मोठा आवाज होऊन स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी त्या वेळी दिल्लीत होत्या. दुर्घटनेची माहिती मिळताच त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ म्हणून अजित पवारांकडे पाहिले जात होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष पोरका झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
बारामतीतील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून आक्रोशाचे दृश्य पाहायला मिळत आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.








