
नागपूर : नागपुरात कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत. प्रवीण दटके यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना प्रकाश अबीटकर यांनी तांत्रिक त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा निगमची बैठक २७ जून २०२५ रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे पार पडली होती. या बैठकीत देशभरात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे या शहरांचा समावेश करण्यात आला होता.
मात्र देशातील इतर नऊ ठिकाणांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले असताना नागपूरचा प्रस्ताव अद्याप शासनाकडून पाठवला नसल्याबद्दल दटके यांनी खंत व्यक्त केली. नागपूरचे नेतृत्व नितीन गडकरी आणि Devendra Fadnavis यांसारखे ज्येष्ठ नेते करत असताना देखील प्रस्ताव पाठवण्यात विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दटके यांनी सांगितले की, हा प्रस्ताव पाठवला गेल्यास एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ होईल. तसेच Nagpur येथे सध्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी) यांच्यासोबत कामगार रुग्णालयाचे रूपांतर तिसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात होऊ शकते.
नवीन नागपूर आणि मिहान परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वसाहती निर्माण होत असून या भागातील कामगारांना याचा मोठा लाभ होईल. तसेच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या हनुमान नगर आणि सिरसपेठ परिसरातील सुमारे तीन एकर क्षेत्रातील कामगार रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुविधा उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालय उभारले गेल्यास येथे मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा उपलब्ध होतील.
यावेळी दटके यांनी शासनाला चार महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये नागपूर येथे ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेबाबत सामंजस्य करार कधी झाला आणि त्याची सद्यस्थिती काय आहे, प्रस्ताव पाठवण्यात विलंब का झाला, राज्यातील कामगार रुग्णालयांची संख्या आणि त्यांची उपकरणे व मनुष्यबळाची स्थिती काय आहे, तसेच नागपुरातील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय कधीपर्यंत कार्यान्वित होणार, याबाबत माहिती मागितली.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, विमा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. प्रस्ताव पाठवण्यापूर्वी काही तांत्रिक त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल.








