Published On : Sat, Mar 24th, 2018

उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे -उपराष्ट्रपती

Advertisement

मुंबई : उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.

ते आज हॉटेल ताज येथे मिंट वृत्तपत्रातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या ‘मिंट कार्पोरेट स्ट्रॅटेजी’ पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, राजशिष्टाचारमंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते.

श्री. नायडू म्हणाले, देशाच्या विकासात उद्योजकांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे देशाचा विकास दर सातत्याने वाढत आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसमुळे उद्योगांना अनेक फायदे झाले आहेत. मॅग्नेटिक इंडिया मुळे जगातील उद्योजकांनी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री मोदी सरकारने जाहीर केलेल्या नव्या फायदेशीर धोरणाचे हे फलित आहे. उद्योग उभारणीसाठी अनेक सोयीसुविधा दिल्याने उद्योजक आकर्षित झाले आहेत. पारदर्शीपणाला प्राधान्य दिल्याने उद्योगधंद्यांना गती प्राप्त झाली आहे. देशात लागू केलेल्या नोटाबंदी, जीएसटीचा फायदाच झालेला आहे. शेअर्स, फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. उद्योजकांनी पारदर्शी कारभारातून समाजाचे कल्याण साधले पाहिजे, असे सांगून त्यांनी पारितोषिक प्राप्त उद्योगपतींचे व मुख्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात उपराष्ट्रपती यांच्या हस्ते श्रीमती रश्मी जोशी, जयंत चॅटर्जी (क्रॅस्टॉल इंडिया), पियुष श्रीवास्तव, श्रीकांत लोणीकर, रुद्रतेज प्रताप सिंग (आयशर मोटर्स), एन.पी.सिंग (सोनी नेटवर्क), रशेष शाह (एडल्वाइस), निदा पालोबा (टाटा स्काय), चंद्रशेखर टिके (टोरेंट फार्मा), आशिष पांचाळ (टोरेंट फायन्नास), रोहित फिल्लीप (इंडिगो एअरलाईन्स), विनीत जैन (अदानी पॉवर), अनुप सहाय (टाटा स्टील) या उद्योगपती व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा उद्योग व्यवसायात उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी हिंदुस्थान टाईम्सचे संपादक सुकुमार यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी मिंट वृत्तपत्राचे संपादक विनय कामत यांनी आभार मानले. यावेळी उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.