Published On : Tue, Jun 29th, 2021

उद्योजक निर्माण करणार्‍या संस्था सुरु व्हाव्यात : ना. गडकरी

Advertisement

चेंबर ऑफ इंडियन एमएसएमईच्या पदाधिकार्‍यांशी संवाद

नागपूर: विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था देशात आहेत. पण उद्योजक निर्माण करणार्‍या संस्था मात्र नाहीत. अशा संस्था असल्या तर तरुणांमध्ये उद्यमशीलता निर्माण करता येईल. बेरोजगारी दूर करण्यासाठी तरुणांमध्ये उद्यमशीलता येणे आवश्यक आहे. बेरोजगारी दूर झाली तर गरिबीचे उच्चाटन करणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

चेंबर ऑफ इंडियन एमएसएमई आणि दै. जागरण यांच्या वतीने आयोजित एका आभासी कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगताना ते म्हणाले- एमएसएमईचे सकल राष्ट्रीय उत्पन्न 30 टक्के, निर्यात 48 टक्केआणि आतापर्यंत 11 कोटी रोजगार निर्मिती एमएसएमईने केली आहे. येत्या कालावधीत एमएसएमईचा जीडीपी 40 टक्के, निर्यात 60 टक्के आणि आणखी 5 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष्य आपण ठेवले आहे.

देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात एमएसएमईची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- एमएसएमईच्या योजनांचा फायदा उद्योजकांना अधिक मिळावा, यादृष्टीने आम्ही कार्यपध्दती बनवीत आहोत, असे सांगताना ना. गडकरी यांनी लघु उद्योग निर्मितीवर अधिक भर दिला. जैविक इंधन निर्मिती, दुचाकी टॅक्सी, हरित क्षेत्र निर्मिती अशी विविध उदाहरणे त्यांनी दिली. आदिवासी, कृषी आणि ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उद्यमशीलता रुजवली गेली, तर मागास भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पेट्रोल-डिझेल या इंधनासाठी जैविक इंधन व इलेक्ट्रिक इंधन हाच पर्याय असल्याचेही ते म्हणाले. उद्योगांचा विकास करण्यास आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.

उद्योगांनी आपले उत्पादन हे दर्जेदार, निर्यात योग्य आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर ठरेल असे तयार करावे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- उद्योगांना अर्थसाह्य करण्यासाठी गैरबँकिंग वित्तीय संस्थांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. यासाठी सक्षम उद्योजकांची गरज आहे.