
मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील दोन महिने मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. राज्याच्या विधिमंडळात तब्बल १६ नव्या सदस्यांची भर पडणार असून राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये १४ जागा विधानपरिषदेसाठी तर २ जागा विधानसभेतील पोटनिवडणुकांद्वारे भरल्या जाणार आहेत.
राज्याच्या विधानपरिषदेतून निवडून गेलेल्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांची जागाही सध्या रिक्त आहे. परिणामी या सर्व जागांसाठी राजकीय समीकरणे पुन्हा एकदा जुळवली जात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील पुणे, सोलापूर, सांगली–सातारा तसेच रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग या मतदारसंघांतही निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये प्राथमिक हालचालींना वेग आला असून मतदार यादीचे अद्ययावत काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली आहे. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असल्याने एप्रिलपूर्वी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. राहुरीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, बारामती मतदारसंघातही पोटनिवडणुकीची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघही रंगणार
याचबरोबर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघ तसेच नागपूर, संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास या पाच जागांसाठीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकूणच, पुढील दोन महिने राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असून विविध पक्षांतील इच्छुकांनी हालचालींना वेग दिला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत होणाऱ्या या निवडणुकांमुळे नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी होणार, हे निश्चित.








