Published On : Thu, Oct 17th, 2019

आर्थिक मंदी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे – खा. मनीष तिवारी

Advertisement

आधुनिक भारत घडविण्यात व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. व्यावसायिकांनी आपली ताकद ओळखावी. आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे. भाजपचे नेते नेहमी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. ही सत्ता बदलून टाका. डॉ. आशिष देशमुख यांच्या रूपाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक चांगला उमेदवार दक्षिण-पश्चिम नागपूरला मिळाला आहे. या मतदार संघातील जनता कॉंग्रेसला नक्की विजयी करणार, असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी व्यक्त केला. ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेसद्वारा आयोजित ‘इंडियन इकॉनॉमी- करंट सिनॅरियो- मिथ्स अँड रियॅलिटीज्’ या कार्यक्रमात ते नागपूर येथे बोलत होते. त्यांचे सोबत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभ क्षेत्राचे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख हे सुद्धा या चर्चासत्रासाठी मंचावर निमंत्रित होते.

उद्योगांमध्ये गुंतवणूक नाही त्यामुळे रोजगार निर्मिती नाही. जीएसटीमुळे व्यापारी खुश नाहीत. सरकार जनतेवर टॅक्स लावला आहे आणि चांगला टॅक्स लावला म्हणून ते आनंद व्यक्त करीत आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केली. आर्थिक मंदी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आहे. हे सरकार व्यापारी विरोधी आहे. लोकांच्या हातचा रोजगार या सरकारने हिरावला आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला गळती लागली. काळा पैसा स्विस बँकेत जमा आहे, अशी हवा भाजपने निर्माण केली आणि जनतेची दिशाभूल केली. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी भाजप सरकारने काहीच उपाय-योजना केल्या नाहीत. रिझर्व बँकेकडून सरकारने पैसा घेतला कारण सरकारला आर्थिक दिवाळखोरीची कल्पना आलेली आहे. समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे काम नेहमी भाजपने केले आहे. उद्या काय होईल, याची भीती जनतेमध्ये आहे. आता महाराष्ट्रात जनतेने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. सत्तेच्या विरोधात आमच्या आवाजात आवाज मिसळून सत्ता परिवर्तन करावे. डॉ. आशिष देशमुख यांना विजयी करून आपल्या क्षेत्राचा आर्थिक विकास करावा, असे ते पुढे म्हणाले.

“भारतात भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक मंदी आहे आणि पंतप्रधान मोदी म्हणतात की, ५ ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करू. मागील ५ वर्षात एकपण उद्योग फडणवीस सरकारने नागपूरच्या मिहानमध्ये आणला नाही. त्यामुळे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यापारी, उद्योजक बुडाले आणि त्याचा परिणाम रोजगारावर झाला. भाजपने आता पुन्हा १ कोटी रोजगाराचे गाजर जनतेला दाखविले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून फेल ठरले आहेत. मुंबईला स्थायिक होऊन ते आता मुंबईचे झाले आहेत, नागपूरचे नाहीत. यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये जनता जबरदस्त परिवर्तन करणार व इतिहास घडविणार. जनतेने संधी दिल्यास नागपूरचा आर्थिक विकास करणार असून या क्षेत्राचा कायापालट करणार”, असे डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हटले.

यावेळी कॉंग्रेसचे श्री. आशिष दुवा, श्री. विशाल मुत्तेमवार, ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेसचे पदाधिकारी व शेकडो श्रोते हजार होते.

दि. १६ ऑक्टोबरला सकाळी सुभाषनगर, कामगार कॉलोनी, गोपालनगर, सहकारनगर, खामला या परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून डॉ. आशिष देशमुख यांनी जनसंपर्क साधला. प्रत्येक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. जबरदस्त परिवर्तन होणार, असा जोश अनुभवायला मिळाला.