Published On : Fri, Mar 30th, 2018

जळगाव जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचे ई भूमिपूजन संपन्न

Advertisement

जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून शासनपातळीवर काम सुरु असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत जळगाव शहर पाणी पुरवठा योजना व जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचा ई-भूमिपूजन समारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला पाटील, महापौर ललित कोल्हे, खासदार ए. टी. नाना पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार एकनाथराव खडसे, आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेश जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून अमृत अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी 249 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम 24 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. विकेंद्रीत पाणीसाठा वाढविण्यावर शासनाचा भर असून सर्वसामान्य माणसाला सुखी, आनंदी ठेवण्यासोबतच सोयीसुविधा देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या गाळेधारकांना कायद्याच्या चौकटीत राहून सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री. लोणीकर म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानात जळगाव शहरासह राज्यातील 44 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातच्या धर्तीवर मुख्यमंत्री पेयजल योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्यात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. राज्यात ४ हजार कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले. आज जिल्ह्यातील 22 योजनांचे ई भूमिपूजन करण्यात आले आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी केले. ज्योती अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास उपमहापौर गणेश सोनवणे, स्थायी समिती सभापती श्रीमती ज्योती इंगळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती प्रतिभा कापसे, सभागृह नेता नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेता वामनराव खडके यांचेसह महापालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत ई-भूमिपूजन झालेले प्रकल्प (रक्कम रु.)
जळगाव तालुका – भोलाणे- 41.97, बिलवाडी- 28.12. जामनेर तालुका- गोंडखेल- 54.09, नवी दाभाडी- 37.11, नांद्रा हवेली- 48.66, मोहाडी-125.42, चिलगाव- 48.08, पिंपळगाव गोलाईत-38.65. धरणगाव तालुका- भोद बु.- 45.69, चांदसर बु.- 31.37, चिंचपुरे- 38.90, अमळनेर तालुका- डांगर बु. 98.00, चाळीसगाव तालुका- वाघळी-157.33, चोपडा तालुका- सत्रासेन-77.82, माचले-41.72, कृष्णापुर-35.78, मजरे हिंगोणे-48.19, गलंगी-29.34, गोरगावले खु. 36.45, भवाळे-34.06, जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत जामनेर तालुका- हिंगणे कसबे- 46.95