मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, भीतीपोटी जादा खरेदी केल्यास पुरवठा व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाकडे पेट्रोल-डिझेलचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध आहे. राज्यातही इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, काही अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असून अनेक ठिकाणी जादा इंधन खरेदी केली जात आहे.
“प्रत्येक शहर, तालुका आणि गावातील इंधनाची गरज लक्षात घेऊन पुरवठा व्यवस्था तयार करण्यात आलेली असते. दररोज आणि दरमहा किती इंधन लागते, याचा अभ्यास करूनच पेट्रोल पंपांना साठा दिला जातो. परंतु अचानक मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली तर व्यवस्था कोलमडते,” असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बँकेचे उदाहरण देत परिस्थिती स्पष्ट केली. “एका दिवसात सर्व लोकांनी एकाच वेळी बँकेतून पैसे काढण्यास सुरुवात केली, तर बँकेवर ताण येतो. त्याचप्रमाणे इंधनाबाबतही परिस्थिती निर्माण होते. याचा अर्थ साठा संपला आहे, असा होत नाही,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत इंधनाचा वापर जपून करण्याची विनंती केली. “जागतिक परिस्थिती गंभीर असली तरी राज्यातील पुरवठा व्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे घाबरून जादा इंधन खरेदी करू नये,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात सुमारे एक महिन्याचा इंधनसाठा उपलब्ध असल्याची माहिती दिली. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.









