नागपूर: देशात आणि राज्यात कोरोनाचे संक्रमण अजूनही सुरुच आहे. हे संक्रमण जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत देशी-विदेशी दारूवर बंदी कायम ठेवावी. जोपर्यंत हे संक्रमण पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यंत कोणत्याही दारूची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
काही लोकांनी देशी-विदेशी मद्य सुरु करा अशी विनंती शासनाकडे केली आहे. कोरोना संक्रमण थांबणार नाही तोपर्यंत दारू विक्रीस परवानगी देऊ नये अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे. ते पुढे म्हणतात की, 2.75 लाख लिटर देशी, 1 लाख 75 लिटर विदेशी, 3 कोटी लिटर बिअर असा 5 हजार कोटींचा व्यवसाय राज्यात होतो.
दारू विक्री सुरु झाली तर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी असलेला पैसा दारूत खर्च केला जाईल. तसेच दारूची दुकाने सुरु झाली तर झुंबड होईल सोशल डिस्टसिंगचा प्रश्न निर्माण होईल. ज्या दलित व गरीब परिवारांनी आपल्या घरखर्चासाठी पैसा उभा केला तो दारूत जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज रोजगार नाही, व्यवसाय बंद आहेत, शेतकर्याला कोणतीच कमाई नाही, अशा स्थितीत मद्यात पैसा खर्च करणे धोकादायक आहेत.
देशी-विदेशी दारूची दुकाने सुरु केली तर गावातील सामाजिक आणि घरातील पारिवारिक वातावरण बिघडण्यास सुरुवात होईल. आज संचारबंदीमुळे सर्वजण घरात आहेत. दारूची विक्री सुरु झाली हे सर्व जण बाहेर पडतील. त्यामुळे कोणत्याही मद्यविक्रीस कोराना संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत परवानगी देऊ नये, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.