Published On : Thu, Mar 23rd, 2017

सामान्य नागरिकांच्या हितासाठी डॉक्टरांनी तात्काळ संप मागे घ्यावा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Advertisement


मुंबई
: सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि उपचाराविना गरिबांचा जीव जाऊ नये यासाठी डॉक्टरांनी तात्काळ संप मागे घ्यावा. रुग्ण सेवेपासून कुणालाही वंचित ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.

सदस्य मिलिंद माने यांनी डॉक्टरांच्या संपाबाबत औचित्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉक्टरांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. राज्य शासनाने हल्लेखोरांवर कारवाई केली आहे. यापूर्वीही डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कठोर कारवाई करण्यात आली आहे. हल्ले रोखण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विधीमंडळानेही कायदे केले आहेत. वेळोवेळी राज्य शासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे.

सध्या डॉक्टरांच्या सुरु असलेल्या संपामुळे सर्वाधिक हाल गरीब रुग्णांचे होत आहेत. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्यासाठी राज्य शासन स्वत:हून पुढाकार घेईल, असे मी डॉक्टरांना आश्वस्त करतो. ज्या नादान लोकांनी डॉक्टरांवर हल्ले केले आहेत व त्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष आहे, त्याची दखल शासनाने घेतली आहे. मात्र, संप करून डॉक्टरांनी गरीब रुग्णांना सेवाशुश्रुषा नाकारणे योग्य नाही. राज्य शासन पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संपामुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. इलाजाअभावी गरीबांना जीव गमवावा लागला आहे. डॉक्टरांबद्दल समाजात मोठा विश्वास आहे.

समाजात लोकांनी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या संपाची निरपराध रुग्णांना सजा भोगावी लागू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.

डॉक्टरांना संरक्षण देण्याची राज्य शासनाची तयारी असून संपामुळे समाजात चीड निर्माण होत आहे. त्यांच्यामध्ये रुग्णसेवेपासून वंचित ठेवल्याची भावना होत आहे, याची दखल डॉक्टरांच्या संघटनांनी घ्यावी. राज्य शासन डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी तयार आहे. मात्र सामान्यांच्या हितासाठी व गरीब रुग्णांना उपचाराअभावी जीव गमविण्याची वेळ येऊ नये यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.