मुंबई :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी धडपड सुरु केली आहे. यातच महायुतीत जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाला.यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना किती जागा द्याव्यात यावरून मतभेद सुरू आहे.
शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली. मात्र आता सगळंच अवघड झालं आहे. यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे, यासाठी धडपड करत आहेत. मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. यामुळे मतभेद सुरु असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची ताकद वाढल्याने पक्ष ३० जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते.शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या, अशी मागणी शिंदेंनी केली. परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यांना 8 जागा आणि अजित पवार यांना 4 जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान गृहमंत्री अमित शाहा मुंबई दौऱ्यावर होते. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाला अमित शहा यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपासंदर्भात अंतिम काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
			




    
    




			
			