Published On : Tue, May 18th, 2021

पिक विमा योजनेच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा :पालकमंत्री

Advertisement

खरीप पीककर्जवाटपाबाबत तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश,कोविडपश्चात कालावधीत जास्तीत जास्त कर्ज मेळावे आयोजित करावे.

नागपूर -. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी , अडचणी असतात. त्या सोडविण्यासाठी विमा कंपनीने जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.

खरीप हंगाम तयारी नियोजन व आढाव्यासाठी बैठकीत ते ऑनलाईन सहभागी झाले होते. पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला हजर होते. त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कृषी सभापती तपेश्वर वैदय,जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी मिलींद शेंडे,कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर उपस्थित होते.खासदार कृपाल तुमाणे,आमदार राजू पारवे ऑनलाईन सहभागी होते. बैठकीच्या सुरूवातीला गेल्या बैठकीचा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला.जिल्हयातील खरीपाचे नियोजन व तयारीचे सादरीकरण कृषी अधिक्षक अधिकारी श्री.शेंडे यांनी केले.

खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत सविस्तर आढावा पालकमंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी घेतला. शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टिने पीक पध्दतीमध्ये बदल करावा. कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून त्यांच्यात जाणीव जागृती करावी .त्यामुळे रब्बी क्षेत्र वाढण्यास मदत होईल. जिल्ह्यात खरीपासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे.त्याचे नियोजन करण्यात यावे. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमामध्ये आवश्यक तो बदल करावा.

सोयाबीन बियाण्यांची कमतरता लक्षात घेता त्याला असलेली मागणी, शेतक-यांकडील उपलब्धता, सोयाबीनचा बाजारभाव व बियाण्याची किंमत यांचा विचार करता शेतक-यांनी सोयाबीनसारखे स्वपरागसिंचित पिकामध्ये स्वत:क़डील बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे.सोयाबीन बियाण्यासाठी महाबीज व खासगी कंपन्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना बियाणे सुलभतेने उपलब्ध करून दयावे, असे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे खते मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना त्यांनी कृषी विभागाला केली. बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता, पुरवठा याबाबत योग्य देखरेख ठेवून संनियंत्रण करावे जेणेकरून गैरप्रकार होणार नाही व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी .तसेच भरारी पथकाच्या मार्फत संनियत्रण करण्यात यावे असेही पालकमंत्र्यांनी निर्देशीत केले.

खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट, दरम्यान युरिया खताची मागणी मोठया प्रमाणावर असते हे लक्षात घेता. जिल्ह्याला जास्तीत जास्त युरिया बफर स्टॉक मिळण्याकरीता पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी कोविड पश्चात कालावधीत जास्तीत जास्त कर्ज मेळावे आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी कंपनीकडे नियमीत पाठपुरावा करावा. पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना संरक्षीत ओलितासाठी पाणी मिळण्याचा दृष्टीने कालवे दुरुस्ती, तसेच खरीप पूर्वीची तयारी सिंचन विभागाने त्वरित करावी.

विद्युत जोडणीकरीता पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले.