मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादावर केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, त्यांच्या विधानाला ‘देशविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन’ असे ठपका ठेवला आहे.
वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान-
एका पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे देशभक्त नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या विधानाला असंवेदनशील ठरवले जात आहे.
बावनकुळे यांचा जोरदार प्रहार-
चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या विधानावर टीका करत म्हटले की, “काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे सत्य वारंवार समोर आले आहे. तरीही वडेट्टीवार असे विधाने करून कोणाला आनंदी करीत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, दहशतवाद्यांच्या कृत्यांचे समर्थन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हा अत्यंत निंदनीय असून, तो देशविरोधी मानसिकतेचा नमुना आहे.
भाजपचे जनतेला आवाहन-
देशप्रेमी नागरिकांनी वडेट्टीवार यांच्या विधानाचा तीव्र निषेध करावा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर काँग्रेसने राजकारण करू नये. वडेट्टीवार यांच्या विधानामुळे काँग्रेसवर चौफेर टीका होत असून, संपूर्ण देशात याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. राजकीय तज्ञांच्या मते, हा वाद आगामी काळात आणखी गडद होण्याची शक्यता आहे.