मुंबई: तूर, सोयाबीन, उडीद यांचे दर अभूतपूर्व कोसळले असल्याचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. कडधान्याच्या पिकाच्या बाबतीतील शासनाचे हमीभाव धोरण सरकारच्या उदासीनतेमुळे कोसळले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान तुर,सोयाबीन,उडीद दराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याने विधानपरिषदेचे कामकाज काही काळासाठी तहकुब करण्यात आले.
तुरीला ५४५० हमीभाव असताना शेतकऱ्यांना चार हजारच्यावर भाव मिळत नाही.त्यामुळे शेतकर्यांचे क्विंटलला दीड हजारांचे नुकसान होत आहे.
राज्यात १ लाख १५ हेक्टरवर तूरीचे उत्पादन अपेक्षित आहे. शासनाने ४४.६ लक्ष क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. नाफेडने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ मार्च २०१८ अखेर केवळ १२.२ लाख क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. फक्त २७ टक्के उद्दिष्टपूर्ती झालेली आहे.
४८ दिवस आता संपलेले आहेत. उरलेल्या ४२ दिवसात ७२.७ टक्के खरेदी शासनाला करायची आहे. मात्र शासकीय गोदामात जागा नाही. ऑनलाईन प्रक्रियेचा गोंधळ चालू आहे.
शासनाने एकूण उत्पनांपैकी दहा टक्के ही तूर खरेदी केलेली नाही. कमीत कमी तूर घ्यावी असा सरकारचा डाव आहे. कर्नाटक राज्य हमीभावावर ५०० रुपये बोनस देत असताना राज्यात हमीभावाने तरी तूर खरेदी करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
हरभराचीही तीच परिस्थिती आहे. ४ हजार ४०० भाव असताना केवळ ३२०० ते ३५०० रूपये भाव मिळतो. हरभऱ्याचीही खरेदी केली जात नाही. आज वीज कनेक्शन तोडले जात आहेत. कर्जमाफीची अंमलबजावणी नाही, बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नाही, गारपीटग्रस्तांनाही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत आज कडधान्याचा उत्पादकही अडचणीत आला आहे. त्यामुळे या गंभीर विषयावर चर्चा करावी अशी मागणी स्थगन प्रस्ताव मांडून केली.