नवी दिल्ली : दिल्लीचे मद्यविक्री धोरण लागू करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून अटक करण्यात आली. आता त्यांना पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. विरोधी पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवणार, असा ठाम निर्धार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
काही झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच सरकार चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक अडचणी येतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. मात्र, इथूनच काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच इतक्या तातडीने ईडी मला अटक करण्यासाठी घरी येईल, असे वाटलेच नाही. मला अटक करण्यासाठी ईडीला दोन ते तीन दिवस लागू शकतील, असे मला वाटले. आई-वडिलांचा आशिर्वाद घेण्याची संधीही मिळाली नाही, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.