
मुंबई : काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकार आणि भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील पत्रकार परिषदेचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.
वडेट्टीवार यांनी म्हटले की, भाजपकडून महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात महिलांना पुरेसे स्थान दिले जात नाही. संबंधित पत्रकार परिषदेत अनेक महिला पदाधिकारी उपस्थित असूनही त्यांना बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप त्यांनी केला.
“महिलांना फक्त मंचावर स्थान देणे आणि निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवणे, हे सक्षमीकरण नव्हे,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे, जे चिंताजनक आहे.
भाजपने खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्यास मंत्रिमंडळात किमान ३३ टक्के महिलांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, सत्तेत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.








