
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दु:खद विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या दु:खद घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी या दुःखद घटनेवर मनाला अत्यंत व्यथित करणारे शब्द व्यक्त करत म्हटले, “दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.”
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.”
त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. या विमान अपघातात उपमुख्यमंत्र्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खातही मुख्यमंत्री सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देत थोड्याच वेळात बारामतीसाठी निघण्याचा निर्णय घेतला आहे.
ही घटना महाराष्ट्रासाठी मोठा धक्का असून राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण शोकाकुल झाले आहे.








