Published On : Wed, Nov 9th, 2022

भ्रष्टाचाराचा पैसा ‘भारत जोडो यात्रे’वर खर्च प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करून कमाविलेला पैसा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून त्यांचा पुत्रांना प्रोजेक्ट करण्यासाठी खर्च करीत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यात्रेपासून कॉंग्रेसचा मूळ कार्यकर्ता दूर असून दिवसागणिक मोठ्या संख्येत कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत, असेही ते म्हणाले.

नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी भारत जोडो यात्रा राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी हायजॅक केल्याचे मत कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचे सांगून ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या छोट्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांची यात्रा ही नेत्याची मुले कॉंग्रेसमध्ये नेते व्हावेत यासाठी काढली आहे. नेत्यांचे पुत्र युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेसाठी भ्रष्टाचारातून कमाविलेला पैसा खर्च करीत आहेत. ही यात्रा कॉंग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांच्या कोणत्याही कामाची नाही. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीत अनेक मोठे बॉम्बस्फोट होतील. यावर अनेकांना आश्चर्य होईल. येत्या दीड वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचा कार्यकर्ता नाराज आहे. हे नाराज कार्यकर्ते भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील असेही भाकित त्यांनी वर्तविले. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वसोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजेंडा राबविला.

राष्ट्रवादीचा आक्रोश अयोग्य
अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत केलेल्या टीके संदर्भात बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांचा पक्ष चालवायचा आहे, ते काम त्यांनी करावे आणि महिलांचा सन्मानच प्रत्येकाने केला पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, सरकारमधील मंत्र्यांनी कुणावरही टिका टिप्पणी करू नये. अब्दुल सत्तारांच्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. पवार कुटुंबावर आरोप करण्यासाठी अनेक जागा आहेत. पण महिलेच्या बाबतीत जे वक्तव्य केले गेले, खासकरून खासदार सुप्रिया सुळेंच्या बाबतीत जे बोलले गेले आहे, असे कुणीही बोलू नये. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्या पद्धतीने जनआक्रोश करीत आहे, ते योग्य नाही.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपा
प्रत्येक नेत्याने महिला नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे, असे सांगून बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान झाल्याची ५० प्रकरणे सांगता येतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या नेत्यांनी भाजपच्या महिला नेत्यांवर आणि एकंदरीत महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह टिका टिप्पणी केली आहे. जेलमध्ये असलेले संजय राऊतसुद्धा आक्षेपार्ह बोलले आहेत. पण जास्त मागे जाऊन विचार करू नये. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे.

अंधारेंनी स्वत:ची बौद्धिक उंची तपासावी
सुषमा अंधारें सुपारी घेतल्यासारख्या बोलतात. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कुठेही बरोबरी होऊ शकते का? असा सवाल बावनकुळेंनी केला. पुढे ते म्हणाले, सुषमा अंधारेंना एवढंच सांगणं आहे की, त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जपून बोलावे ज्यांच्याबद्दल त्या बोलतात, त्या नेत्यांची उंची आणि स्वतःची बौद्धिक उंची त्यांनी तपासून घ्यावी.