
नागपूर : राज्यातील दहावी व बारावीच्या निकालांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मधील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे निकाल तयार करण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
मंडळातील बढती व बदलीसाठी असलेला कालावधी दोन वर्षांवरून वाढवून चार ते सहा वर्षे करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय घेताना राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात न घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
सध्या राज्यभर लाक्षणिक कामबंद आंदोलन सुरू असून, २८ एप्रिलपासून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.








