नागपूर: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. बुधवारी सकाळपर्यंत देशात १०४७ सक्रिय रुग्ण नोंदवले गेले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी ६६ नवे रुग्ण सापडले आहेत, यातील तब्बल ३१ रुग्ण मुंबईतून आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३२५ वर पोहोचली आहे.
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. जेजे रुग्णालयात १५ खाटांचा स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने २६ मे रोजी शेवटचा अधिकृत डेटा प्रसिद्ध केला होता. त्यावेळी देशात १०१० सक्रिय रुग्ण होते, परंतु आता ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. उत्तर प्रदेशातही १० नवीन रुग्ण आढळले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी तयारी सुरू केली असून विविध राज्यांमध्ये रुग्णालयांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.