Published On : Sat, Feb 13th, 2021

वीजबील भरून महावितरणला सहकार्य करावे- महावितरण

Advertisement

जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार


नागपूर: कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. पण नागपूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख वीज ग्राहकांनी एप्रिल-२०२० पासून वीज देयकाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा आगामी काळात खंडित करण्यात येणार आहे.

एप्रिल-२०२० ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पर्यंत नागपूर जिल्ह्यातील १,०९,२१९ घरगुती वीज ग्राहकांकडे १६१ कोटी रुपये, १३,५३४ वाणिज्य वीज ग्राहकाकडे २८.८ कोटी रूपये, १३८७ औद्योगिक वीज ग्राहकाकडे ६ कोटी ५०लाख रूपयांची थकबाकी आहे.

राज्यातील 41 लाख 7 हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील 80 लाख 32 हजार ग्राहकांनी एप्रिल 20 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये करोडो रूपयांची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना 24X7 वीजपुरवठा करण्यासाठी दरमहिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात वीजबिलांच्या एकूण ९८०४९९ पैकी ९३३३२४ तक्रारीचे निवारण महावितरणने केले आहे. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.अन्यथा महावितणरणला वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागेल

विजेचे दर हे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाद्वारे निश्चित करण्यात येत असतात. वाढीव वीज बिल आल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत असून याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे. तेंव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.