Published On : Tue, Apr 13th, 2021

सायकलमुळे जल आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण : ना. गडकरी

Advertisement

हिरो ई सायकलचे उद्घाटन


नागपूर: सायकलमुळे जल आणि वायू प्रदूषण रोखणे शक्य होते, तर इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत करणे शक्य आहे. तसेच प्रकृतीसाठी सायकल हे अत्यंत प्रभावी वाहन आहे. या दृष्टीनेच महामार्गाचे बांधकाम शहरात करताना सायकल चालकांसाठी एक वेगळा ट्रॅक उपलब्ध करून सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम शासन करीत असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘हिरो ई सायकल व्हॅली’चे उद्घाटन आज ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅ. अमरिंदरसिंग, हिरो ई सायकलचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक पंकज मुंजाल उपस्थित होते. वाहतूक ही आता प्रथम जलमार्गाने, नंतर रेल्वेमार्गाने, नंतर रस्त्यांनी आणि शेवटी आकाश मार्गाने व्हावी असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशात आज 80 टक्के वाहतूक ही रस्तेमार्गांनी होत आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘मास रॅपिड ट्रान्सपोर्ट’ ही देशाची गरज आहे. सायकल हा स्वदेशी, सामान्यांना परवडणारा, प्रदूषण रोखणारा आणि इंधन खर्चात बचत करणारा पर्याय आहे. प्रकृती तंदुरुस्त राखण्याचे कामही सायकल चालविण्याने होते, असेही ते म्हणाले.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायकल आता नव्या रुपात लोकांसमोर आणली जात आहे. सर्व जगात सायकल उद्योगाची उलाढाल 6 लाख कोटींची आहे.

वाहतुकीत खोळंबा न होणारा भारतातील सायकल उद्योग जगातील दुसर्‍या क्रमांकांचा उद्योग आहे, असे सांगताना ना. गडकरी यांनी सर्व भारतीय सायकल निर्मिती कंपन्यांना आवाहन केले की, ही वेळ आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचे वर्चस्व निर्माण करण्याची असून ही संधी लक्षात घेता चांगल्या दर्जाच्या सायकलींची निर्यात वाढवा. उत्पादनचा दर्जा चांगला असेल तर आपण निश्चितपणे निर्यात करू शकू. तसेच रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही सायकल उद्योग अत्यंत महत्त्वाचा असून या उद्योगात नवीन रोजगार निर्मितीची क्षमता खूप आहे. 7 हजार कोटींची उलाढाल या उद्योगाची असल्यामुळे निर्यातीची क्षमताही या उद्योगाची मोठी आहे. या क्षेत्रातही देश आत्मनिर्भर होऊ शकतो, असेही ना. गडकरी म्हणाले.