बारामती– विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच काँग्रेसच्या माघारीने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आभार मानले. “ही निवडणूक सुरुवातीपासूनच बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत सकारात्मक असून तो दादांना खरी आदरांजली आहे,” असे ते म्हणाले.
जय पवार पुढे म्हणाले, “अजितदादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी काम केलं. सर्व पक्षांना सोबत घेऊन त्यांनी विकास घडवला. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकारणाची नाही, तर त्यांच्या कार्याला आदर देण्याची आहे. काँग्रेससह सर्व पक्षांनी दाखवलेली एकजूट मनाला दिलासा देणारी आहे.”
दरम्यान, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही इतर उमेदवारांशीही संपर्क साधत आहोत. अनेकांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. शक्य तितके अर्ज मागे घेण्यासाठी चर्चा सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीसाठी एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३० जणांनी माघार घेतली असली तरी अद्याप २३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. त्यामुळे निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता कमी असली तरी महायुतीसाठी परिस्थिती अनुकूल झाल्याचे चित्र आहे.
“आज काँग्रेसने आम्हाला साथ दिली आहे. भविष्यात त्यांच्या पक्षासमोर काही अडचणी आल्या, तर आम्हीही त्यांना मदत करू,” असे म्हणत जय पवार यांनी काँग्रेसबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.









