Published On : Tue, May 28th, 2019

१० जूनपूर्वी नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : नदी स्वच्छता अभियानाचा घेतला आढावा

नागपूर: कुठलीही अतिवृष्टी आली तरी शहरात पाणी साचायला नको. यासाठी शहरातील चेंबर, नाल्या, पावसाळी नाल्या आणि नद्या स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन वाढवा आणि १० जूनपूर्वी नदी, नाले स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पावसाळापूर्व तयारी आणि नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कार्यालय सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, आमदार कृष्णा खोपडे, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता आणि सर्व सहायक आयुक्त उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी सर्वप्रथम नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी स्वच्छता अभियानाचा स्ट्रेचनिहाय आढावा घेतला. ज्या स्ट्रेचचे कार्य अद्यापही ५० टक्क्यांच्या वर झाले नाही तेथे मशीनरी आणि कामाचे तास वाढवून कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मागील पावसाळ्यात पावसाचे पाणी शहरात साचले. ते वाहून जाण्यात अडथळा आल्यानेच गंभीर परिस्थिती उद्‌भवली होती. यावर्षी तसे होणार नाही यासाठी पूर्वीपासूनच नियोजन करावे. मेट्रोच्या अख्यत्यारीत असलेले कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यासाठी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नदी स्वच्छता अभियानांतर्गत नदीतून माती काढल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ती नदी पात्रातच ठेवण्यात आली आहे. ती माती तेथून काढून इतरत्र टाकण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. नागपूर शहरातील पावसाळी नाल्या, चेंबर, नाले स्वच्छ करण्याचा वेग वाढविण्यात यावा आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन ती कामे पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकांचे पत्र घ्यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी सर्व संबंधित सहायक आयुक्तांनी नाले, पावसाळी नाल्या, चेंबर सफाईचा गोषवारा मांडला. बैठकीला नदी स्वच्छता अभियानात जबाबदारी सोपविण्यात आलेले सर्व अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement