Published On : Thu, Aug 3rd, 2017

महावितरणच्या ग्राहक संपर्क अभियानात 18 हजारांवर तक्रारींचे निराकरण

Advertisement

Maha-vitran

नागपूर: महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटीबध्द असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’ सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहकसंपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे 18 हजार 555 ग्राहकांच्या तक्रारी व अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.

महावितरणच्या राज्यभरातील 16 परिमंडलांत माहे जुलै 2016 मध्ये हे ग्राहकसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत राज्यभरात 1,746 ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहकसंपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली तसेच सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतरही तक्रारीही जागेवरच सोडविण्यात आल्या.

राज्यात या अभियानांतर्गत एकूण सुमारे 22 हजार 966 तक्रारी व अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 18 हजार 555 तक्रारी/अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. उर्वरित 4 हजार 411 प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून त्याची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात येत आहे. एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीजबिलींगबाबत असून त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या संदर्भात वारंवार चुकीचे रिडिंग घेणाऱ्या एजन्सींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले आहेत.नागपूर परिमंडलात 400 पेक्षा जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले.

महावितरणच्या ग्राहकसंपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या अभियानात नवीन वीजजोडणी, इतर वीजसेवेविषयकच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.