Published On : Sun, Apr 11th, 2021

Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार

Advertisement

राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या (Corona Task Force) सदस्यांनी कमीतकमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. यावर उद्या पुन्हा सकाळी 11 वाजता टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची बैठक होणार असून यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी स्पष्ट केले आहे. (CM uddhav Thackreay, Dy CM Ajit Pawar will take descision on maharashtra Lockdown.)

कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले होते.

आजच्या बैठकीत रेमडेसीवीर, ऑक्सिजनचा तुटवड्यासह राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर चर्चा झाली.

कालच्या बैठकीत काय झाले?काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला.

अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेचच लॉकडाऊन करण्यात येणार नाही, काही दिवसांचा वेळ देऊन ल़ॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे थोड्याच वेळात 8 दिवस की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्याआधी तीन कामकाजी दिवसांचा वेळ द्यावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.