Published On : Fri, Dec 13th, 2019

शहराच्या विकासकार्यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : महापौर

Advertisement

मनपा-इक्वीसिटी अंतर्गत ‘स्मार्ट सिटी’वर कार्यशाळा

नागपूर, : नागपूर शहराची ओळख अल्पावधीतच देशभरात ‘स्मार्ट सिटी’ म्हणून झाली आहे. शहरात सुरू असलेल्या विकासकार्यांमध्ये नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इक्वी सिटी अंतर्गत ‘स्मार्ट सिटी : व्हिजन ॲण्ड प्रोग्रेस’ या विषयावर सेंटर प्वाईंट हॉटेलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपमहासंचालक रवी रंजन, युरोपीयन युनियनचे शौमिक दत्ता, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागपूरचे विभागीय संचालक जयंत पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, नागपूर शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराच्या विकासासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्न करत आहे. शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचालही सुरू आहे. ही प्रक्रिया निरंतर आहे. ही प्रक्रिया जमिनीस्तरावर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शहर स्मार्ट करण्यासाठी इक्वी सिटीसारखे प्रकल्प हे महत्त्वाचे ठरणार आहे, असेही महापौर यांनी यावेळी सांगितले.

उपमहासंचालक रवी रंजन यांनी प्रास्ताविकातून इक्वी सिटी प्रकल्पाविषयी माहिती दिली. इक्वि सिटी प्रकल्प २०१६ मध्ये नागपूर शहरात सुरू करण्यात आला. केंद्र शासनाने १०० स्मार्ट सिटी मध्ये नागपूरची निवड केली. या उपक्रमाअंतर्गत अनेक प्रशिक्षणवर्ग व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती रवी रंजन यांनी दिली. ३०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमांतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, इक्वी सिटी अतिशय स्तुत्य उपक्रम असून मागील एक वर्षांपासून या प्रकल्पांशी मी निगडित आहे. या प्रकल्पाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर हे कौतुकास्पद आहे. स्मार्ट सिटीचे कार्य हे नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा या महत्त्वाच्या ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. शहराच्या या विकासगंगेत नागरिकांचे सहकार्यही मोलाचे आहे, असेही आयुक्त यांनी सांगितले.

युरोपीयन युनियनचे शौमिक दत्ता यांनी युरोपीयन युनियनबाबत माहिती दिली. युरोपीयन युनियन ही संस्था अशा प्रकारच्या संस्थांना अर्थसहाय्य प्रदान करते. युरोपीयन युनीयन आणि भारत सरकार यांच्यामध्ये २०१६ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या संस्थेमार्फत घनकचरा व्यवस्थापन, पानीपुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प यासारख्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करत असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यशाळेमध्ये ‘स्मार्ट सिटीचे सद्यस्थितीत कार्य’ या विषयावर स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी मार्गदर्शन केले. ‘स्मार्ट सिटीअंतर्गत शहराची वाटचाल’ या विषयावर सुलक्षणा महाजन यांनी माहिती दिली. तर डॉ.कपील चांद्रायन यांनी ‘स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांची जबाबदारी’ याविषयावर मार्गदर्शन केले.

मान्यवरांचे स्वागत प्रकल्प संचालक अमृता आनंद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जयंत पाठक यांनी केले. कार्यक्रमाला मनपातील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.