Published On : Tue, Jul 24th, 2018

नागपुरात खड्ड्याला दिले मुख्यमंत्र्यांचे नाव

Advertisement

नागपूर : राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यादरम्यान, नागपूर येथे खड्ड्यांमुळे सात नागरिकांचा बळी गेला.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील खड्ड्यांना ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खड्डा मार्ग’ असे नाव देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष अल्का कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्डयाची पूजा करून नामकरण श्लोकचे पठणही करण्यात आले.

राज्यभरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले. खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अनेक ठिकाणी वाहनचालक खड्डयात उसळून पडत आहे. अनेकांचे तर अपघात झाले आहेत. पाऊस बंद झाला की याच रस्त्यांवरील गिटी व धुळांचे धूर वाहनचालकांसाठी त्रासदायक होत आहे. यावरून या रस्त्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस येत आहेत.

गेल्या १५ वर्षांपासून नागपूर मनपात सत्तेत असलेल्या भाजपचे व गेल्या चार वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या याच पक्षाचे सरकार शहराची धूळधाण करीत आहे. यावरून या सरकारच्या कामाचे परिचय होत आहे. यासर्व बाबींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यांच्यामध्ये पडलेल्या खड्डयांना नाव देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येत आहे.

यादरम्यान, शहरातील रामेश्वरी रोडवरील एका खड्डयांची पूजा करण्यात आली असून, या खड्ड्याला मुख्यमंत्र्यांचे नाव देऊन त्यांचे लक्ष यानिमित्ताने वेधले जात आहे. यांनतर तरी सरकारला जाग येईल आणि ते तातडीने दुरुस्ती करेल. याचबरोबर, भविष्यात अशाप्रकारचे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून, भ्रष्टाचारास थारा देणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.