
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, ते सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रश्नाबाबत सकारात्मक असून मागील काही दिवसांत सरकारने केलेल्या हालचालींची माहितीही जरांगेंना देण्यात येणार आहे.
“मी सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड देखील संपर्कात आहेत. उद्या जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेल्या दोन-तीन दिवसांत सरकार स्तरावर काय प्रयत्न झाले, याची माहिती देणार आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
“30 मे रोजी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. यावेळी मंडप नसेल, सावली नसेल. मे महिन्याच्या कडक उन्हात बसणार आहे. मेलो तर मेलो, पण आता मागे हटणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
तसेच, “कोणत्याही समाजबांधवांनी अंतरवली सराटीकडे येऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.
आता उद्या होणाऱ्या विखे पाटील आणि जरांगे यांच्या भेटीत काय चर्चा होते, सरकार कोणता तोडगा काढते आणि उपोषणाबाबत जरांगे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.







