
नागपूर : उज्जैन येथे देवदर्शन करून नागपूरकडे परतत असलेल्या भाविकांच्या कारचा मध्य प्रदेशात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बैतूल-हरदा सीमेवरील ढाकना गावाजवळ ही घटना घडली. या अपघातानंतर नागपूर आणि कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनजवळील नलखेड़ा येथील बगलामुखी मंदिरात दर्शन आटोपून चार जण नागपूरकडे परतत होते. त्यावेळी अचानक कारवरील ताबा सुटल्याने वाहन उलटले. अपघात इतका भीषण होता की कामठी येथील शुभम उर्फ विजय जायसवाल (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे मामा पारस कनोजिया (३५, रा. मानकापूर, नागपूर) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या दुर्घटनेत अमन जायसवाल (२६) आणि जतिन कनोजिया (३४) गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघातानंतर मागून येणाऱ्या टवेरा वाहनचालक अंकित तिवारी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. जखमींच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी काही प्रवासी झोपेत होते, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.
या हृदयद्रावक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून नागपूर आणि कामठी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.








