नामजपाचा संकल्प दृढ करा श्रीहरी महाराज
बुलढाणा। रामनामाचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी आपलं संपुर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्रीहरी महाराजांच्या वाढदिवस तिथी निमित्ताने बुलडाणा, खामगांव, अकोला, मलकापूर, जळगांव ते श्रीक्षेत्र माकोडी अशा पायी वारी सोहळ्याचे आयोजन भाविकांनी केले होते. 24 जुलैला सायंकाळी विविध ठिकानावरुन आलेले वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात शेलापूर मार्गे माकोडी पोहचले. पावसाच्या कोसळणाऱ्या हलक्या सरी अन् श्री राम जय राम जय जय रामच्या नाम घोषात चिंब होत वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नाम घोषात पाऊलीचा ठेका, फुगड्यांचे फेर धरत सर्व भाविकांनी वारी सोहळ्याचा आत्मीक आनंद घेतला.
भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत निश्चित भेटतो. प्रापंचीक वस्तु आपण कितीही मिळविल्या तरी पुर्ण समाधान मिळेल, असे नाही. याउलट भगवंताचे नाम स्वत: पुर्ण असल्याने भगवतांची मनापासुन अळवणी करा यासाठी संकल्पाची शक्ती दृढ करुन नाम जप वाढवा, असे मौलीक मार्गदर्शन श्रीहरी महराज यांनी भाविकांना 25 जुलै रोजी चैतन्य मंदिर माकोडी येथे केले. जसे ज्या प्रमाणे माणसाला मान, लौकीक, पैसा इत्यादी गोष्टी हव्याच असतात त्या प्रमाणे, भगवंत देखील मला हवा आहे. असे म्हणत त्याच्या नामाचे अनुसंधान टिकवा, असेही श्री हरी महाराज म्हणाले. सकाळी काकडा आरती नंतर महाराजांच्या मंगल स्नान, पाद्य पुजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांचे साखरतुला व लाडु तुला देखील भाविकांनी केली. दुपारी नैवद्य आरती नंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.