जळगाव – बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही,अशा कडव्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर फडणवीसांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले की, “मराठी माणसांची ताकद एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांचे मालक हे आपले नोकर इकडेतिकडे भेटी घेतात,” अशा प्रकारच्या आरोपांना मी फारसा महत्व देत नाही. टीका करणाऱ्यांपेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम करणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.”
फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना, धरणगाव येथे क्रांतिवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारक आणि संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी जनजाती समाजाच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करत, “इतिहासाने जनजाती नायकांवर अन्याय केला. मात्र मोदी सरकार त्यांना योग्य सन्मान देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगितले.
ते म्हणाले, “स्वातंत्र्य लढ्यात अनेक जनजाती नायकांनी मोलाचे योगदान दिले. मात्र त्यांचा इतिहास दडपला गेला. प्रत्येक जिल्ह्यातील अशा लढवय्यांच्या स्मृती जपण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळेल.”
धरणगाव महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी आदिवासी व जनजाती समाजाच्या संघर्षशील परंपरेचे कौतुक करत त्यांच्या गौरवासाठी पुढील योजनांची माहिती दिली.