
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज दोघांनीही अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. सभागृहात घोषणा आणि जल्लोषाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत नव्या महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले.
“आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजप महायुतीचे सदस्य महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले, याचा मला अतिशय आनंद आहे. महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे महायुतीचे दोन्ही शिलेदार आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
मुंबईकरांना लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. जनतेने दिलेल्या कौलाला साजेसं प्रशासन देण्याची ही सुरुवात आहे, असे सांगत त्यांनी रितू तावडे यांना “अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा” अशी विशेषणं दिली. “मागील काळात त्यांनी मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुती सरकारने सुरू केलेला मुंबई विकासाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे राबवला जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपमहापौर संजय घाडी यांच्या अनुभवाचाही महापालिकेला फायदा होईल, असे सांगत फडणवीस म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अपेक्षित असं प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी मिळून मुंबई महापालिकेला नवी दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करतील, असे आश्वासन देत “मी आणि एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहू. आपण घडवत असलेल्या नव्या मुंबईला आणखी गती देण्याचं काम या माध्यमातून होईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.








