
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षाच्या नगरसेवकांसाठी गोवा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, मतदान होईपर्यंत त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची नजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक १० जून रोजी नागपुरातून मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर ११ जूनला विमानाने गोव्यात जाणार असून तेथे काही दिवस मुक्काम करणार आहेत. या काळात संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण, पर्यटन तसेच परस्पर संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१८ जून रोजी होणाऱ्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून डॉ. राजीव पोतदार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे रिंगणात आहेत. निवडणुकीत कोणताही धोका पत्करायचा नसल्याने भाजपने नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
गोवा दौऱ्यानंतर सर्व नगरसेवक मुंबईत परतणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर रामभाऊ प्रबोधिनी येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरातही त्यांचा सहभाग राहणार आहे.
नगरसेवकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय गट तयार करण्यात येणार असून प्रत्येक गटावर पक्ष पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना मात्र या दौऱ्यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, भाजप हा कार्यक्रम संघटन बळकटीकरण आणि प्रशिक्षणाचा भाग असल्याचे सांगत असली तरी विरोधक आणि राजकीय विश्लेषक याकडे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे १८ जूनच्या मतदानात या रणनीतीचा किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







