नागपूर : भाजप सत्तेसाठी पैशांचा वापर करते आणि पैशाच्या जोरावर सत्ता मिळवते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वाडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
वाडेट्टीवार म्हणाले, सत्ता मिळवण्यासाठी पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्याचं समीकरण भाजपने अगदी काटेकोरपणे राबवलं आहे. नागपूर महापालिकेत असंख्य समस्या प्रलंबित आहेत, पण भाजपला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. त्यांना केवळ सत्ता मिळवायची आहे आणि तीही पैशाच्या जोरावर.
महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आम्ही हे सगळं जनतेसमोर आणणार आहोत. नागपूर शहराची सध्याची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील भ्रष्टाचार लोकांपुढे मांडला जाणार आहे. नागपूरचे केंद्रीय मंत्री असोत की मुख्यमंत्री – सगळेच एकाच तयारीत व्यस्त आहेत.
मनपा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल, या प्रश्नावर बोलताना वाडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस ही राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्या पक्षाची स्थानिक पातळीवरील भूमिका कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार ठरवली जाईल. शिवाय, क्षेत्रीय पक्षांबाबत कोणती भूमिका घ्यायची, हे आमची पक्षश्रेष्ठी ठरवतील.
इंडिया आघाडीसंदर्भात त्यांनी सांगितले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला आहे, त्यामुळे ते आघाडीत आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत काय निर्णय होणार, हे पवार साहेबच ठरवतील. आम्हाला वाटतं की शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत.
तसेच, त्यांनी स्पष्ट केलं की, जर आम्ही एकत्र आलो, तर तो आघाडीचा निर्णय असेल. पण जर नाही आलो, तर काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. भाजप आघाडीच्या गोंधळात जनतेची दिशाभूल करत आहे.
मनपात भाजपने केलेल्या घोटाळ्यांची माहिती उघड करत, काँग्रेस आता लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनिती स्थानिक स्तरावरच निश्चित केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.