Published On : Fri, May 22nd, 2020

भाजपने वेळ व काळाचे भान ठेवावे : राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण शिवराज बाबा गुजर

Advertisement

भाजपने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करुन नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे.

देश कोरोनाच्या भयानक संकटाशी झुंज देत असताना भाजप पक्षाला आंदोलनाचे सुचत आहे. अशी टिका करत, भाजप नेत्यांनी आपण कोणत्या प्रसंगी राजकारण करत आहोत याचा विचार करुन, वेळ व काळ याचे भान बाळगुन वागावे असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण शिवराज बाबा गुजर यांनी भाजप नेत्यांना दिला.

भाजपाचे ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्ध्यांचा अपमान आहे. ही वेळ आंदोलनाची नसून कोरोनाशी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आहे. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याचा विसर पडलेला दिसत असल्याचे शिवराज गुजर म्हणाले. महाराष्ट्रतील जनता भाजपाचे नाटकी राजकारण नक्की हाणून पाडेल. आज महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखिम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योद्ध्यांचा व महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढत असताना अशा आंदोलनाच्या माध्यमातुन या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे.

उमरेड, भिवापूर, कुहीच्या सेतू केंद्राला टाळे
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न असल्याचे गुजर म्हणाले. मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या गेल्या आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे. राज्यात झोपडपट्टया, दाट लोकवस्ती, ग्रामीण भाग तसेच इतर सर्व आव्हानांवर मात करुन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. आज आपल्या राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या आत आहे. त्यांच्यापैकी १० हजार रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत.

राज्याने गेला सव्वा महिना सहा लाखांहून अधिक परप्रांतीय मजूरांच्या निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आजमितीला ५ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरुप परतले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक यंत्रणा, प्रत्येकजण आपापल्या परीने या लढाईत सहभागी झाला आहे. असे असताना भाजपने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करुन नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत.

भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच कोरोनाविरुद्धची लढाई सर्व आव्हानांवर मात करून महाराष्ट्र नक्की जिंकेल असा विश्वास महाआघाडी सरकारला आहे. कोरोना युद्ध संपलंकी राजकीय आखाडा सुरु करू असा टोला जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी भाजपा नेत्यांना लावला आहे.