Published On : Mon, Dec 4th, 2017

फडणवीसांवर टीका करणारं ट्वीट, भाजपची सायबर सेलकडे तक्रार

Advertisement

मुंबई : भाजपच्या ट्विटर हँडलवरुन कोणतंही ट्वीट केलं नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्वीट प्रसिद्ध होण्याचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा हँडल हॅक झालं का, याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे एका तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत हीन दर्जाचा प्रचार विरोधकांकडून होत असताना ट्विटर अकाऊण्टशी कुठे छेडछाड तर झाली नाही ना, असा संशय भाजपने व्यक्त केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलचा दुरुपयोग करण्यात आला असून ते हॅक झाल्याची शक्यता भाजपने वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी तक्रार भाजपच्या वतीने सायबर विभागाकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भाजपचं @BJP4Maharashtra हे अधिकृत ट्विटर हँडल आहे. भाजपचे प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड हे हँडल वापरतात. रविवार, 3 नोव्हेंबर रोजी मेरखेड किंवा अन्य कोणीही पक्षाच्या वतीने अधिकृतपणे काहीही ट्वीट केलं नाही. मात्र सकाळी सव्वादहा वाजता भाजप सरकारसंदर्भात आक्षेप घेणारं ट्वीट प्रसिद्ध झालं, असं भाजपने तक्रारीत म्हटलं आहे.

काय होतं ट्वीट ?

”राज्यात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फडणवीस सरकार 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करायला निघालंय. मेक इन महाराष्ट्र आहे का फूल इन महाराष्ट्र?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टॅगही करण्यात आलं आहे.

भाजप सोशल मीडिया सेलच्या हा प्रकार लक्षात येताच हे ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत या ट्वीटचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यामुळे सरकारला ट्रोल करण्याची आयती संधी नेटिझन्सला मिळाली.