
मुंबई : राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात शासनाने महत्त्वाची स्पष्टता केली आहे. योजनेअंतर्गत मिळणारा मासिक १,५०० रुपयांचा हप्ता पुढे नियमित मिळवण्यासाठी आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्याच लाभार्थी महिलांच्या खात्यात पुढील रक्कम जमा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांचे पैसे थांबले होते. डिसेंबर २०२५ पासून तांत्रिक त्रुटी, अपूर्ण माहिती किंवा चुकीची निवड केलेल्या पर्यायांमुळे लाभ रोखला गेला होता. काही लाभार्थींनी चुकून सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्याचे नमूद केल्यानेही पात्रता तपासणीत अडथळे निर्माण झाले. सुरुवातीला अंगणवाडीमार्फत पडताळणीचा विचार होता, मात्र तो रद्द करून ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे.
ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर थकीत हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार महिन्यांचा लाभ प्रलंबित असल्यास सुमारे सहा हजार रुपये थेट खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांनी त्वरित माहिती दुरुस्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली असल्याची माहिती दिली. यापूर्वी ही मुदत डिसेंबर २०२५ होती. नव्या मुदतीनंतर दुरुस्तीची संधी मिळणार नसल्याने लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शासनाने लाभार्थींना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार लिंक, वैयक्तिक माहिती व निवडलेले पर्याय तपासून दुरुस्ती करण्याचे आवाहन केले असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थिती तपासून खात्री करून घ्यावी, असे सांगितले आहे. योग्य वेळी ई-केवायसी पूर्ण केल्यास पुढील हप्ते नियमित मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.








