नागपूर – दक्षिण-पश्चिम नागपूरमधील जुना सोनेगाव विमानतळ मार्ग एकेकाळी आंब्याच्या झाडांनी नटलेला होता.नागपूरकरांची आवडती मॉर्निंग-वॉक स्पॉट असलेली भोंसलेकालीन आमराई, आज हळूहळू नष्ट होताना दिसत आहे. कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांखाली दबलेली ही ऐतिहासिक जागा आता ओळखूही येत नाही इतकी विद्रूप झाली आहे.
गर्द झाडांमध्ये वसलेली ही रमणीय जागा, जिथे मुरलीधर आणि हनुमान मंदिरासारखी सुंदर, शांत देवस्थाने आहेत. आता बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा, आणि बांधकाम साहित्याने भरली आहे. भरदुपारी इथे जुगार खेळणारे, दारू पिणारे टोळके दिसतात. काही ठिकाणी अनधिकृत टाकावू सामानही फेकले जात आहे.
शतकांपूर्वी भोसले राजांनी या भागात स्वच्छंद वेळ घालवण्यासाठी आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ही जागा विकसित केली होती. आज त्या वैभवशाली इतिहासाच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. मंदिरासमोरील वडाचं झाड, तलाव, आणि जुनी विहीर हे सगळं दुर्दैवाने उपेक्षेच्या गर्तेत आहे.
इतिहासातलं वैभव, आज दुर्लक्षात हरवताना-
३०० वर्षांपूर्वीची आमराई, जुने नागपूरकर सांगतात की, या परिसरात मोठमोठी आंब्याची झाडं, फिंपळ, बोर, कडू लिंबासारखी झाडं मोठ्या प्रमाणात होती. त्याच परिसरात मुरलीधर मंदिर आणि हनुमान मंदिर आजही अस्तित्वात आहेत. १८व्या शतकातील मुरलीधर मंदिर, कोकणातील पारंपरिक शैलीत बांधलेलं, कोरीव लाकडी खांब आणि कृष्ण-रुक्मिणी-सत्यभामांच्या मूर्तींसह आजही इतिहास जपून आहे.मंदिराच्या समोरच असलेला शाही सोनेगाव तलाव, जो भोंसले राजांचा ‘स्विमिंग टँक’ होता, आता मुलांचं बॅडमिंटन मैदान बनलं आहे. तिथल्या शामियाना जागा, जुनी विहीर आणि मोठं वडाचं झाड हे सगळं या परिसराच्या ऐतिहासिक अस्तित्वाची साक्ष देतं.
या मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात –
-एअरपोर्ट प्रशासनाने परिसर संरक्षित करून ओपन स्पेस डेव्हलपमेंट योजनेत समावेश करावा.
– महापालिकेने नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि सूचना फलक लावावेत.
-पोलीस प्रशासनाने जुगारी, नशा करणाऱ्यांविरोधात तातडीची कारवाई करावी.
-परिसरात सीसीटीव्ही आणि लाईटिंगची सोय करून रात्रीची सुरक्षितता वाढवावी.
-स्थानिक नागरिकांसाठी ‘आमराई संरक्षण समिती’ स्थापन करावी.
कचऱ्याच्या सडा आणि दारूच्या बाटलांचा खच-
परिसरात फेरफटका मारला असता, प्लास्टिकच्या वेफर्स पिशव्या, बिअरच्या बाटल्या, पाण्याचे ग्लास, बांधकामाचे टाकलेलं मटेरियल, हे सर्व ठिकठिकाणी विखुरलेलं दिसतं. दुपारच्या वेळी दारू पिणाऱ्यांचे टोळके, जुगारी, आणि अनेकदा अनैतिक कृत्यांची भीती वाटणारा एकांत –यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
पर्यावरणदिनाच्या निमित्ताने..
.आज संपूर्ण जग वृक्षसंवर्धन आणि निसर्गरक्षणाच्या गोष्टी करतोय. पण आपण आपल्याच शहरातील ज्या हिरव्या खुणा आहेत, त्या जपण्यात कमी पडत आहोत का?‘आमराई’ ही केवळ झाडांची जागा नाही, ती आपल्या इतिहासाची, आठवणींची आणि संस्कृतीची साक्ष आहे.