Published On : Fri, Jan 18th, 2019

पुढील तीन वर्षात भांडेवाडी होईल कचरामुक्त : मुख्यमंत्री

Advertisement

भांडेवाडीतील बायोमायनिंग प्रकल्पाचे भूमिपूजन : पूर्व नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप

नागपूर : घनकचऱ्यापैकी १० लाख मेट्रिक टन कचरा साचलेले भांडेवाडी पुढील तीन वर्षांत बायोमायनिंग प्रकल्पाच्या माध्यमातून कचरामुक्त होईल. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तीन वर्षानंतर या २२ हेक्टर जागेवर उद्यान, घरे किंवा कुठलाही प्रकल्प निर्माण करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

भांडेवाडी येथील कचऱ्यावर बायोमायनिंगच्या माध्यमातून प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि पूर्व नागपुरातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केडीके महाविद्यलयासमोरील मार्गावर आयोजित कार्यक्रमात मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बायोमायनिंगमुळे भांडेवाडी येथील सुमारे २२ हेक्टर जागा कचरामुकञत होईल. अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारे नागपूर हे राज्यात पहिले शहर ठरले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण कमी होईल. मागील अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या दुर्गंधीपासून आणि रोगाच्या प्रादुर्भावापासून परिसरातील नागरिकांची सुटका होईल. स्वच्छ सर्वेक्षण जरी स्पर्धा असली तरी यामाध्यमातून नागरिकांना चांगली सवय लागावी, हाच हेतू आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहर प्रथम यावे, असे आपणास वाटते. लोकसहभागामुळे हे शक्य आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छतेचे वारकरी व्हा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मालकी हक्काचे पट्टे वाटपासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्वी प्रत्येक नेत्याने ‘गरिबी हटाव’ असा नारा दिला. परंतु, नेमके काय करायचे, हे कुणालाच समजले नाही. गरीबाला किमान जमिनीचा हक्क दिला तर तो विकास करू शकतो. आमचे सरकार येताच पट्टेवाटपातील अडचणी दूर करण्याचे ठरविले. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी हा निर्णय घेतला. त्यात ज्या-ज्या त्रुट्या होत्या, त्या वेळोवेळी शासन आदेशात दुरुस्ती करून दूर केल्या. या निर्णयामुळे ग्रामीण भागात सुमारे १० लाख गरीबांना हक्काचे घर मिळणार आहे. शहरी भागातील आकडाही तेवढाच आहे. या निर्णयामुळे दुखावलेले अनेकजण खोटं सांगण्याचा प्रयत्न करतील. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका. शेवटच्या माणसापर्यंत या निर्णयाचा लाभ मिळेपर्यंत काम बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. नागपुरात ५० हजार गरिबांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत पट्टेवाटपाचा निर्णय घेतल्याबद्दल जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हक्कासाठी लढणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी केले. संचालन महेंद्र राऊत यांनी केले.

आमचे राजकारण विकासाचे : ना. गडकरी
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आम्ही जात, पात, पंथ, धर्म बघून कधीच राजकारण केले नाही. ज्यांनी मत दिले त्यांनाही आणि ज्यांनी मत दिले नाही त्यांच्यासाठीही कार्य केले. गरीबाला धर्म, पंथ नसतो. विकासाच्या कामात कधीच भेदभाव केला नाही. आम्ही केवळ सेवा केली आणि विकासाचे राजकारण केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा केली. २० हजार कोंटीचा मेट्रो प्रकल्प आकार घेत आहे. आचारसंहितेपूर्वी नागपूरचे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ बनणार आहे. अंबाझरी, तेलंगखेडी, शुक्रवारी तलावातील पाण्यावर विमान उतरविण्याचे आपले स्वप्न आहे. नंदनवन परिसरात पूर्वी अंधार होता. रस्ते नव्हते. आता येथे वीजही आली. सीमेंटचे रस्ते बनले. आता या परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीधारकाला जमिनीचा अधिकार बहाल करताना अभिमान वाटतो आहे. विकासाचा रथ यापुढेही वेगात धावेल, असा विश्वास त्यांनी दिला.

३५ हजार नागपूरकरांना लाभ : ना. बावनकुळे
१७ नोव्हेंबर २०१८ चा शासन आदेश हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे एकट्या नागपुरातील सुमारे ३५ हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहराला रखडलेले ३५० कोटींचे विशेष अनुदान मिळवून दिले. जीएसटीची तूट भरून काढीत ४० कोटी प्रति महिना अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासन प्रत्येकाच्या हिताचे निर्णय घेत आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. यात आता नागपूरला पहिल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

४५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टेवाटप
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नऊ झोपडपट्टीतील प्रत्येकी पाच अशा एकूण ४५ झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले. यामध्ये पडोले नगरमधील आशा श्रीफुल जेठे, मंजुला जयराम पाटील, गीता ताराचंद गोरेकर, बबिता राहुल जेठे, पारवताबाई तुलसीराम वानखेडे, संघर्ष नगर येथील कौशल्या लक्ष्म वर्मा, ललिता रामू बरामार, काजल श्रावण केवटे, नाजीर मजीत शेख, निमुन निसार करीम पठाण, डिप्टी सिग्नलमधील लोकराम मरई, शारदाबाई सेवक साबरसाठी, शगुनबाई बलिराम चंदनमलागर, हरकुराम दौना शाहु, सरस्वतीबाई मुकुंद साहु, मनकुवरबाई बिसौहा चंदेल, हिवरीनगर येथील तजु मो. मुसा शेख, शोभा केशवराव रणदिवे, अर्चना किसना तितरमारे, वंदना दिलीप गोमासे, रेखा वासुदेव तितरमारे, शमा परवीन शेख रहेमान, सोनबा नगर येथील माधुरी संजय धकाते, सपना श्याम शिंदे, सविता दिनेश येरपुडे, सरस्वती नंदनलाल वर्मा, मोना डोमाजी सहारे, साखरकरवाडी येथील प्रिया संजय लाडोले, शांतीबाई नीळकंठ पटेल, स्वागी दुखु निषाद, कुंभारटोली येथील संगीता उत्तम मेश्राम, सरस्वती गुलाबराव मानवटकर, बेबीबाई वासुदेव ढोके, बेबी ताराचंद डोंगरे, हसनबाग येथील रिझवाना बेगम मोहम्मद बशीर, अतिक अहमद लाल मोहम्मद, नझीर खान सिकंदर खान, नासीर खान नझीर खान, इंदुबाई संभाशिव साखरकर, मेहताम आलम अब्बास अली, नंदनवन येथील नत्थु सखाराम साठवणे, रामलाल शिवाजी वघारे, राजकुमार वंजारी, चंद्रकला दशरथ बेचरे, मोहन यादव मेश्राम यांचा समावेश आहे.

मनपा पदाधिकारी, नगरसेवकांची उपस्थिती
कार्यक्रमातील व्यासपीठावर मनपाचे परिवहन सभापती बंटी कुकडे, आरोग्य सभापती मनोज चापले, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिष दिकोंडवार, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक बाल्या बोरकर, अनिल गेंडरे, प्रदीप पोहाणे, नगरसेविका रेखा साकोरे, संगीता चकोले, सरीता कावरे, मनिषा अतकरे, मनिषा धावडे, कांता रारोकर, वैशाली रोहणकर, जयश्री रारोकर, अभिरुची राजगिरे, ज्योती भिसीकर, वंदना भुरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपअभियंता राजेश दुफारे, नासुप्रचे सुनील गुज्जलवार, एनएमआरडीएचे सुधाकर कुळमेथे आदींची उपस्थिती होती.