
मुंबई : महाराष्ट्रात आता लग्नातील पंगतीपासून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, रमजान आणि ईदच्या काळात आयोजित करण्यात येणारे महाप्रसाद, भंडारे, लंगर, अन्नछत्र तसेच इफ्तारच्या कार्यक्रमांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे तसेच अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना रोखता याव्यात, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने प्रथमच ‘सण-उत्सव अंमलबजावणी मार्गदर्शिका’ कायमस्वरूपी लागू केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक सणाच्या वेळी स्वतंत्र आदेश काढण्याची जुनी पद्धत बंद करून व्यापक आणि कायमस्वरूपी व्यवस्था लागू केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार राज्यात कोणत्याही प्रकारचे सामूहिक भोजन, महाप्रसाद, भंडारा किंवा लंगर आयोजित करायचा असल्यास कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी संबंधित स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना विहित नमुन्यात पूर्वसूचना देऊन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आयोजकांनी आठवडाभर आधी माहिती दिल्यास अन्न सुरक्षा अधिकारी कार्यक्रमापूर्वीच आयोजनस्थळी भेट देऊन स्वयंपाकाची जागा, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची प्रत्यक्ष पाहणी करू शकतील, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. अन्नाची गुणवत्ता कायम राखणे आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका मुळापासून दूर करणे हा या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने सण आणि उत्सवांची व्याप्ती तसेच त्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन त्रिस्तरीय देखरेख व्यवस्था निश्चित केली आहे. या अंतर्गत संबंधित सण सुरू होण्याच्या २१ दिवस आधीपासून ते सण संपल्यानंतर ३० दिवसांपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर सामूहिक भोजनाचे आयोजन करणाऱ्या संस्था, मंडळे आणि आयोजकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.




