नागपूर : बेलतरोडी पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे एका महिलेचे प्राण वाचले असून संभाव्य हत्येची मोठी घटना टळली आहे. गोटाळपांजरी परिसरात पतीने पत्नीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. मात्र वेळेत पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करून तिचा जीव वाचवण्यात यश आले.
ही घटना मध्यरात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. बेलतरोडी पोलिसांची नाईट पेट्रोलिंग टीम परिसरात गस्त घालत असताना आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना थांबवून मुलगा सुनेवर जीवघेणा हल्ला करत असल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण घोडके आणि पोलिस कर्मचारी रितेश गोतमारे तातडीने घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
घरात आरोपी ऋषिकेश वानखडे हा पत्नी आश्लेषा वानखडे हिच्यावर चाकूने हल्ला करत असल्याचे दिसून आले. पोलिस कर्मचारी रितेश गोतमारे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीच्या हातातील रक्ताने माखलेला चाकू हिसकावून घेत आरोपीला ताब्यात घेतले.
जखमी महिलेला तत्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पथकाने सुमारे ९ किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करत महिलेला वेळेत उपचार मिळवून दिले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात चार वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समोर आले आहे. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच त्याने हा हल्ला केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या धाडसी कारवाईबद्दल शहरभरातून बेलतरोडी पोलिसांचे कौतुक होत असून नागपूर पोलिस आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.









