Published On : Mon, May 28th, 2018

फेरमतदान होईस्तोर मतमोजणी नको; प्रफुल्ल पटेलांची मागणी

Advertisement

Praful Patel
गोंदिया: आज होत असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडल्याने हजारो मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता आला नाही. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया येथे अनेक ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या असून ३४ मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागणार आहे. फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करू नये आणि ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्यात याव्यात, अशी मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी केवळ गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रात नसून पालघर व उत्तरप्रदेशातील बरहाणपूर येथे सुध्दा ३०० वर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनच्या विश्वासहर्तेवर परत एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचे पटेल यांनी म्हटले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुरत येथून मागविलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन्सच्या वापरावर आम्ही सुरूवातीपासून आक्षेप घेतला होता. यासंबंधीची तक्रार सुध्दा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यांनी याकडे दखल घेतली नाही. त्याचाच फटका आजच्या मतदान प्रक्रियेदरम्यान बसला. महाराष्ट्रात ईव्हीएम मशिन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध असताना सुरत येथून मशिन मागविण्याची गरज काय होती? महाराष्ट्रातील तापमान मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक असते ही बाब सर्वांनाच माहिती आहे. मग अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन काम करीत नसल्याचे निवडणूक विभागाचे अधिकारी सांगत आहे. यावरुन नेमके काय समजायचे असे पटेल म्हणाले.

आमचा लोकशाही पध्दतीवर विश्वास असून निवडणुका हे त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पादर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ईव्हीएममधील बिघाडाबाबत आपला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप नसून हा सर्व निवडणूक विभागाचा गलथान कारभार आहे. जर अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडत असतील किंवा काम करीत नसतील तर ज्या मशिन सुरु आहेत त्या देखील योग्य तºहेने काम करीत आहेत का? हे कसे समजायचे असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. यासर्व प्रक्रियेमुळे झालेल्या मतदानावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून मतदान झालेल्या सर्व व्हीव्हीटीपॅटच्या पावत्यांची शंभर टक्के मोजणी करण्यात यावी. अशी मागणी पटेल यांनी केली. पत्रकार परिषदेला आ.राजेंद्र जैन व पदाधिकारी उपस्थित होते.