नागपूर: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने ३ ते १३ ऑगस्ट २०२५ हा कालावधी अवयवदान पंधरवडा म्हणून जाहीर केलेला आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात अवयवदान पंधरवडा निमित्त अनेक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. एक व्यक्ती मृत्यूनंतरही ८ जणांना जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे ३ व ४ ऑगस्ट २०२५ रोजी मनपाचे ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मनपा दवाखान्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरात अवयवदान पंधरवडाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात सुरू असलेल्या अवयवदान पंधरवडा मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी अवयावादानासाठी पुढे यावे व सहजरीत्या नोंदणी करता यावी यासाठी राज्य सरकारद्वारे संकेतस्थळ जारी करण्यात आले आहे. www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून सहजरित्या अवयवदानासाठी शपथ घेऊन नोंदणी करता येत आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात १३२४ रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. आपला एक निर्णय अशा रुग्णांसाठी नवजीवन ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागपूरकरांनी www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरून अवयवदानासाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या अवयवदान पंधरवडाची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेतून अवयवदानासंबंधी भीती आणि गैरसमज दूर करून वैज्ञानिक माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.