
नागपूर -देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “पैसे कुठेही गुंतवू नका, भविष्यात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील आर्थिक परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. “बँका रिकाम्या होत आहेत. रिझर्व्ह बँकेतील निधीही वापरला जात आहे. भविष्यात बँकांची अवस्था आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सध्या असलेले पैसे सुरक्षित ठेवावेत आणि मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहावं,” असं वडेट्टीवार म्हणाले.
इंधन दरवाढ, वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सामान्य माणूस होरपळून निघत असल्याचा आरोप त्यांनी केला. “देशात फक्त इव्हेंटबाजी सुरू आहे. महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीतील घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही, तोपर्यंत चर्चांना अर्थ नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर सर्व आमदार परत येतील,” असा दावा त्यांनी केला.
कल्याणमधील बकरी ईदच्या दिवशी झालेल्या तणावावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “देशात धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण तयार केलं जात आहे. लोकांच्या भावना भडकवून राजकारण केलं जात आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.







