औरंगाबाद: राज्यातील दहा महापालिकांमध्ये महापौर पदाच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता राज्यातील काही भागांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणूका होत आहेत. औरंगाबादमध्येही नुकतीच ही निवडणूक झाली असून इथे शिवसेना आणि काँग्रेसने युती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार असेल, असा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना हा सत्तेत सहभागी पक्ष असून कॉंग्रेस हा विरोधी पक्ष आहे. हे दोन्ही पक्ष नेहमीच ऎकमेकांवर चिखलफेक करत असतात. कॉंग्रेसवर शिवसेनेनेही अनेक भ्रष्टाचारांचे आरोप केले आहेत. अशातच आता सत्तेसाठी मात्र हे सगळं विसरून सेनेने कॉंग्रेसचा हात धरला आहे. जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. पंचायत समिती सभापतीपदासाठी राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती पाहायला मिळाली. तेच चित्र जिल्हा परिषदेतही दिसत आहे.
भाजपला रोखण्यासाठी सेना आणि कॉंग्रेसने हा आगळावेगळा फॉर्म्युला अमलात आणला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेत २२ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. पण शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षपद देण्याच्या अटीवर काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेची ६२ एवढी सदस्य संख्या असून ३२ ही मॅजिक फिगर आहे. शिवसेनेला १८ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेची सदस्यसंख्या मिळून ३४ झाली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (६२)
शिवसेना – १८
भाजप – २२
काँग्रेस – १६
राष्ट्रवादी – ३
मनसे – १
अपक्ष (भाजप पुरस्कृत) – १
अपक्ष – १