नागपूर: देशाचे माजी पंतप्रधान, भाजपचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, कुशल वक्ते व थोर चिंतक अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्ती नव्हे तर एक विचार होता. त्यांचे निधन म्हणजे एक युगाचाअंत होय, अशी भावना राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या अटलजींचे राजकारण उदारमतवादी व समानतेचे होते. राजकारणात राहूनही अजातशत्रू असलेल्या अटलजींनी देशालाच नव्हेतर विश्वाच्या राजकारणाला दिशा दिली. अनेक दशकांपर्यंत देशाची सेवा करून संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले, अशा भावनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
भाजपचे मार्गदर्शक असलेल्या अटलजींनी पक्षात लाखो कार्यकर्ते घडविले आणि पक्षाशी जोडले. पक्षाची एक नैतिक शक्ती ते होते. देशासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेण्यास तेकधीही मागे हटले नाही. अणूचाचणी करून त्यांनी संपूर्ण विश्वाला भारताची ताकद दाखवून दिली. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत झाला असून भारतीय राजकारणाचे नभरून निघणारे नुकसान झाल्याचे बावनकुळे म्हणाले.